एक अलौकिक व्यक्तिमत्व
प.पू श्री विष्णुदास महाराजांनी श्री सद्गुरुदास महाराजांना गुरुवार दिनांक १६ फेब्रुवारी १९८४ माघ शुध्द पौर्णिमा शके १९०५ रोजी सकाळी ९.१५ वाजता दत्तवाडी तेल्हारा येथे अनुग्रह देऊन कृतार्थ केले. कालांतराने आपल्या जपाची रुद्राक्षाची माळ त्यांच्या गळ्यात घालून ‘जे द्यायचे ते सर्व मी तुम्हालाच देईल! याबद्दल निःशंक असावे. तुमची निवड आम्ही विशिष्ट कार्यासाठी केलेली असून तुमची प्रतिष्ठा वाढावी अशी आमची इच्छा आहे’ असा आशीर्वाद दिला. योगीराज दत्तात्रेय, श्रीपादश्रीवल्ल्भस्वामी, श्री नृसिंहसरस्वतीस्वामी, श्रीमत् वासुदेवानंदसरस्वतीस्वामी, प.पू. प्रज्ञानंद सरस्वतीस्वामी, प.पू. विष्णुदास महाराज या थोर आणि अक्षुण्ण दत्तपरंपरेचा वारसा दऊन महाराजांना शक्तिसंपन्न केले. प.पू.श्री विष्णुदास महाराजांनी ध्यानात संदेश देऊन विजयरावांचे ‘सद्गुरुदास’ असे पारमार्थिक नामकरण केले. सद्गुरुचरणांवर अनन्य श्रध्दा आणि सद्गुरुभक्ती हा श्री सद्गुरुदास महाराजांचा स्थायीभाव आहे. पूर्वायुष्यात घडलेले शिवकार्य हे प.पू श्री विष्णुदास महाराजांच्या प्रेरणेनेच घडलेले गुरुकार्य आहे हा महाराजांचा विनम्र भाव आहे.
सद्गुरुदास महाराजांचे नियत गुरुकार्य म्हणजे प.पू श्री विष्णुदास महाराजप्रणीत उपासनेच्या माध्यमातून दत्तभक्तीचा प्रचार व प्रसार हे आहे. गुर्वाज्ञेने जयप्रकाशनगर नागपूर येथील स्वगृही महाराजांनी २६ ऑगस्ट १९९६ रोजी श्री दत्तमूर्तीची प्राणप्रतिष्ठा करुन श्री गुरुमंदिराची स्थापना केली. तरल मनाने सद्गुरुंनी घालून दिलेल्या परंपरप्रमाणे साधना करणा-या साधकाला ईश्वरी शक्तीचा व सद्गुरुकृपेचा – शक्तीचा प्रत्यय निश्चित येतो. उपासनेने चित्त-बुद्धी शुद्ध होते. त्यामुळे सद्गुरुदास महाराजांनी गुरुमंदिरात शुद्ध व निष्काम उपासनेवर भर दिला. व्रतस्थ राहून केलेल्या उपासनेमुळे व संपूर्ण गुरुकृपेमुळे सद्गुरुदास महाराजांची बुद्धी प्रकाशित होऊन तिला परतत्वाचा स्पर्श झाला आहे. त्यांच्या अंतरी ज्ञानाची ज्योत प्रकट झाल्यामुळे त्यांच्या ठायी निर्भयता, निर्धार, निष्ठा, निष्कामता हे गुण सदैव जागृत असतात. दुखीः संकटात सापडलेले अनेक लोक श्री गुरुमंदिरात नित्य येत असतात. त्यांच्या दुखःनिवारणाचे उपाय त्यांना सांगून सद्गुरुदास महाराजांनी अनेकांना उपासनेला लावले आहे. त्यामुळे अनेक कुटुंबाचे ते श्रद्धास्थान व आश्रयस्थान आहे.
महाराष्ट्रातच नव्हे तर देशात अनेक ठिकाणी तसेच मस्कतसारख्या मुस्लिमबहुल राष्ट्रात उपासना केंद्रांची स्थापना गावोगावीच्या उपासकांनी केली.२००४ साली समर्थ सद्गुरु श्री विष्णुदास महाराजांची आद्य तपोभूमी असलेल्या भांबेरी येथील ‘औदुंबरवाडी’ या तीर्थक्षेत्राचा जीर्णोध्दार व त्याच ठिकाणी श्री गुरुपंचायतन मंदिर समूह महाराजांनी स्थापन केला. २००६ साली श्री क्षेत्र पवनी येथील प.पू. श्रीमत् वासुदेवानंदसरस्वती स्वामींच्या चातुर्मासाने पावन झालेल्या श्री विठ्ठल मंदिराच्या जीर्णोध्दाराचे कार्य केले. २००७ साली श्री क्षेत्र लाखनी येथे भव्य अशा श्रीगणेशदत्त मंदिराची निर्मिती केली.३ फेब्रुवारी २०१२ रोजी संतश्रेष्ठ श्री गजानन महाराजांचे मंदिर उभारून सद्गुरुंची इच्छा पूर्ण केली. नित्योपासनेसोबतच श्रीगुरुपौर्णिमा, श्रीदत्तजयंतीउत्सव, यज्ञयाग, विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन, आध्यात्मिक शिबिरांचे आयोजन, अध्यात्मप्रवचने, विविध तीर्थक्षेत्री भक्तांसोबत यात्रांचे आयोजन महाराज प्रत्यही करीत असतात.
प.पू श्री विष्णुदास महाराजांच्या प्रेरणेने निर्माण झालेले नागपूरचे गुरुमंदिर हे एक ऊर्जास्त्रोत आहे. श्री गुरुमंदिराच्या प्रांगणात ज्या जागी प.पू श्री विष्णुदास महाराजांनी भूमिपूजन केले होते त्या जागेवर भव्य त्रिमुखी औदुंबर वृक्ष उभा आहे. प्रत्यक्ष स्वयंभू श्रीगणेश आपल्या शक्तिसहित श्री औदुंबरवृक्षात प्रकट झाले आहेत. सद्गुरुशक्तीचा प्रत्यय अनेकांना अनेक प्रकारे महाराजांच्या श्रीगुरुमंदिरात नित्य येत असतो. शुध्द व प्रयोगशील अध्यात्म आणि निष्कामता हा महाराजांच्या उपासना पध्दतीचा विशेष आयाम आहे.
प.पू श्री विष्णुदास महाराजांच्या सहवासाने परिसस्पर्शित झालेले श्री सद्गुरुदास महाराजांचे जीवन ही दत्तसंप्रदायातील एक तेजोदीप्ति आहे. एकेकाळचे सुप्रसिध्द शिवकथाकार श्री विजयराव देशमुख सद्गुरु श्री विष्णुदास महाराजांचे दास्यत्व स्वीकारून प.पू.श्री सद्गुरुदास महाराज या नाममुद्रेने अधिकारपदी आरुढ आहेत.